मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प सुरू झाले. मात्र मागील अडीच वर्षात या प्रकल्पांमध्ये अनेक विघ्ने आली. आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत. पर्यावरण ऱ्हासाचा कांगावा करत अनेक विघ्ने आणली गेली, पण आता मात्र ही विघ्ने दूर झाली आहेत. पर्यावरण वाचवाच्या नावाखाली सुरू असलेले राजकीय प्रदूषण अखेर बंद झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली. मेट्रो ३ मार्गावरील ट्रेनची ट्रायल रन आज पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कॉलनी सारिपूत नगर येथे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. यावेळी अनेक प्रकल्प सुरू झाले. समृद्धी महामार्गासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला. परंतु अनेक प्रकल्पांना विरोधही झाला. यादरम्यान आम्हीही अनेक आव्हानांचा सामना करत हे सरकार स्थापन केले. तसेच मेट्रो ३ प्रकल्पही अनेक आव्हानाचा सामना करत, पुढे सरकत आहे. अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
प्रकल्पाला झालेल्या विलंबाबाबत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. कारडेपोवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नसता, तर पुढील आणखी चार वर्षे हा प्रकल्प पुढे सरकला नसता. खरेतर डिसेंबर २०२३ रोजी हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु कारडेपोचा राजकीय वाद निर्माण केला गेल्याने प्रकल्प रखडला. आता मात्र मेट्रो धावण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.