Ayodhya Ram Mandir | हरजित सिंग यांचा अयोध्येत विशेष लंगर, खलिस्तान्यांना चपराक
अयोध्या; वृत्तसंस्था : हिंदू आणि शीख वेगळे आहेत, असे विष शिखांमध्ये कालविण्याचे काम पाकिस्तान सातत्याने करत आलेला आहे; पण पाण्यात कितीही काठी आदळली तरी ते वेगळे होत नाही, हे म्हणणे आहे निहंग शीख सरदार बाबा हरजित सिंग यांचे! सिंग हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लंगर (अन्नछत्र) चालविणार आहेत. (Ayodhya Ram Mandir)
बाबा हरजित सिंग यांच्या या उपक्रमामागचे कारण हे की, राम मंदिर मुक्ती आंदोलनात पोलिसांतील पहिला गुन्हा शिखांवरच दाखल झाला होता. हरजित सिंग (आठवी पिढी) यांचे पूर्वज फकीर सिंग यांनी आपल्या 25 निहंग सहकार्यांसह 1858 मध्ये संपूर्ण बाबरी परिसर ताब्यात घेतला होता. सतत 25 दिवस ते येथेच राहिले होते. यादरम्यान त्यांनी सलग रामाची पूजा व हवन केले. 30 नोव्हेंबर 1858 रोजी तत्कालीन अवध पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविली गेली. सुप्रीम कोर्टाच्या मंदिराबाबतच्या निकालपत्रात या घटनेचा उल्लेख आहे.