बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. मात्र, सत्तेसाठी आम्ही ऑपरेशन हस्त राबवणार नाही, असा दावा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
शहरातील जनतेने महापालिकेत भाजपला सत्ता चालविण्यासाठी पुरेसे संख्याबळ दिले आहे. त्यामुळे त्यांनी कामकाज चालवावे, अशी आमची धारणा आहे. तरीही भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही कोणत्याही कारणास्तव ऑपरेशन हस्त राबवणार नाही. आम्ही आमचे काम करत राहणार आहोत. पुढील निवडणुकीत काँग्रेस जिंकून सभागृहात सत्ता मिळवेल. महापालिकेत आम्ही विकासावर भर देत आहोत. पण, सत्ताधारी भाजपमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे नाराज भाजप नगरसेवक वारंवार बैठका घेत आहेत. त्यांच्यात चलबिचल सुरू असल्यामुळे ते एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यांच्या नेत्याने सर्व अधिकार आपल्याकडेच ठेवले असल्यामुळे इतर नगरसेवकांना बोलता येत नाही, ही त्यांची अडचण झाली आहे, असा टोलाही पालकमंत्री जारकीहोळी यांनी लगावला.
नगरसेवकांनी नगरसेवक म्हणून काम करावे, आमदारांनी आमदार म्हणून काम करावे. तर खासदारांनी संसदेत आवाज उठवणे आवश्यक असते. पण, महापालिकेत भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्रित शक्ती वाया घालवत आहेत, अशीही टीका जारकीहोळी यांनी केली.