![GPS tracker](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2F%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वेरुळांना तडा जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. रुळाला तडा गेल्यानंतर त्याची माहिती तातडीने रेल्वे नियंत्रण कक्षाला उपलब्ध व्हावी आणि दुरुस्ती पथक योग्य वेळेत घटनास्थळी पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने ट्रॅकमनला जीपीएस ट्रॅकिंग आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळा संपताच मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत, कर्जत-लोणावळादरम्यान मोठ्या प्रमाणात धुके आणि थंडी पडण्यास सुरुवात होते. तीव्र थंडीमुळे रेल्वे रुळ आकुंचन-प्रसरण पावण्याच्या घटना घडतात. थंडीमुळे रुळ जोडणीवरदेखील परिणाम होतो; मात्र त्याची तीव्रता कमी प्रमाणात असते. अशावेळी रुळांवर गस्त घालणार्या ट्रॅकमनची जबाबदारी मोठी असते. रुळांवर गस्त घालताना काही त्रुटी आढळल्यास संबंधित जागेची नेमकी माहिती नियंत्रण कक्षाला मिळावी यासाठी जीपीएस ट्रॅकरचा मोठा फायदा होणार आहे, असे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले.