पुढारी ऑनलाईन डेस्क : कमी उत्पादन आणि उशीरा झालेला पाऊस यामुळे टोमॅटोचे भाव देशातील काही राज्यांमध्ये १२० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. घाऊक बाजारात टोमॅटो ७० रुपये किलोपर्यंत आहे. टोमॅटोबरोबरच काही भाज्यांचे दरांमध्ये अचानक झाली आहे. आता टाेमॅटाे वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'टोमॅटो ग्रँड चॅलेंज' सुरू करण्याची योजना आखली आहे.
काय आहे 'टोमॅटो ग्रँड चॅलेंज'?
भारतातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, अनेक शहरांमध्ये १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. टोमॅटो ग्रँड चॅलेंजच्या माध्यमातून ग्राहक व्यवहार मंत्रालय वस्तूचे उत्पादन, प्रक्रिया आणि साठवण सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आमंत्रित करेल. आम्ही या आठवड्यात टोमॅटो ग्रँड चॅलेंज सुरू करणार आहोत. आम्ही नाविन्यपूर्ण कल्पनांना आमंत्रित करू, प्रोटोटाइप तयार करू आणि नंतर कांद्याच्या बाबतीत जसे केले तसेच टोमॅटोबाबतही आम्ही करणार आहोत, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी 'पीटीआय'ला सांगितले.
टोमॅटोची प्राथमिक प्रक्रिया, काढणीनंतर, साठवणूक आणि टोमॅटोचे दर ठरवणे, मूल्यवर्धन करताना तोटा कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक उपाय शोधणे हा या आव्हानाचा उद्देश आहे. मागील वर्षी आम्ही कांद्याचे उत्पादनाबाबत असा प्रयोग केल्याचेही त्यांनी सांगितले. साठवणूक आणि प्रक्रिया सुधारून टोमॅटोच्या किमती सामान्य पातळीवर आणता येतील. किमती स्थिर राहण्यासाठी बियाणे स्तरावर नाविन्य, प्राथमिक साठवणूक, काढणीनंतर आणि पीक माहिती आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही दरवाढ हंगामी आहे. लवकरच भाव खाली येतील. काही भागात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.
तामिळनाडूमध्येही सरकारने टोमॅटोच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटो येथे फार्म फ्रेश आऊटलेट्स (FFO) वर विकले जातील. 'एफएफओ'मध्ये टोमॅटो 68 रुपये किलो दराने उपलब्ध केला जाईल. 'एफएफओ'वर ६० रुपये किलोने टोमॅटो विकण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. तामिळनाडूचे सहकार, अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री पेरियाकरप्पन यांनी सांगितले की, सरकारने टोमॅटोच्या किमती नियंत्रित करण्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ३ ते ५ रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलो होते. मात्र जूनमध्ये त्यात अचानक दरवाढ होऊन आता टोमॅटो काही ठिकाणी १०० रुपयांवर गेला आहे. टोमॅटोचे भाव गेल्या आठवड्यात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होत आहे.
हेही वाचा :