कोल्हापूर : सरकारी कर्मचार्यांना आता ऑनलाईन रजा द्यावी लागणार आहे. सर्व शासकीय कार्यालयात आता ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू झाली आहे. याद्वारेच रजेचा अर्ज स्वीकारावा, असे आदेश राज्य शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. यामुळे रजेचा गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे.
शासकीय कार्यालयातील कामकाज गतीने व्हावे याकरिता आता ई-ऑफिस ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयातील फाईल्सची संख्या कमी होऊ लागली आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे कुठेही फाईल्स उघडणे, वाचणे आणि त्यावर कार्यवाही करणे शक्य होत असल्याने अधिकारी, कर्मचारी नसल्याने फाईल्स थांबली, असे आता होणार नाही.
याच प्रणालीत आता सरकारी कर्मचार्यांच्या रजेचाही समावेश केला आहे. यामुळे रजा घ्यायची असेल तर संबंधित कर्मचार्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने त्यावर वेळ नमूद होत असल्याने रजेचा अर्ज ठरावीक वेळेतच द्यावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज दाखल झाल्याने संबंधित कर्मचार्यांच्या नावावर रजा पडणार आहे. या प्रकारामुळे रजेचे अनेक कार्यालयांत सुरू असणारे गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे.
असे होतात रजेचे गैरप्रकार
रजा घेतली जाते. पण अनेकदा रजेचा अर्जच दिला जात नाही. परिणामी कर्मचारी रजेवर जातात. पण त्याची रजा नोंद होत नसल्याने ती शिल्लकच राहते. अनेकवेळा रजेचा अर्ज लिहून ठेवला जातो. त्यावर तारीख मात्र घातलेली नसते आणि सुट्टी घेतली जाते. रजेबाबत जास्तच गाजावाजा झाला तर त्यावर त्या दिवसाची तारीख घातली जाते, अन्यथा त्या दिवशी सुट्टी मिळते. पण रजा खर्ची पडत नाही. अनेकवेळा अर्ध्या दिवसाची रजा दिली जाते. पण, दुसर्या दिवशी तो अर्ज वापरला नाही तर फाडून टाकला जातो. यामुळे अर्ध्या दिवस सुट्टी घेता येते.