पुढारी ऑनलाईन डेस्क : G20 परिषदेला उपस्थित विदेशी पाहुण्यांना सोन्या-चांदीच्या ताटात भाेजन दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारला फटकारलं होते. याला भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने असं बोलण बरोबर नाही. ते अस्वस्थ आहेत. म्हणून असं काहीही बेरकी वक्तव्य करायला लागले आहेत, असे महाजन यांनी म्हटलं आहे. (Girish Mahajan)
G20 परिषदेवर बाेलताना शरद पवार म्हणाले हाेते की, विविध देशातील प्रमुखांच सन्मान करणं हे आपलं काम आहे; पण या निमित्ताने मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. काही ठराविक लोकांच्या मोठेपणाचा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर होतोय. हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला हाेता.
पवारांना उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की," विदेशी पाहुण्यांना केळीच्या पानात खावू घालायच का? की पळसाच्या पत्रावळीवर घालायच का? आपला देश विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे. जग आपल्याकडे आश्चर्याने पाहत आहे की, भारताने या ठिकाणी काय केलं आहे; पण शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. त्यांच्याकडे आठ-दहा आमदार-खासदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते काहीही बेरकी वक्तव्य करायला लागले आहेत.
जे सोडून घेले आहेत. त्यांना परत घेणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी (दि.१०) केले हाेते. यावर महाजन म्हणाले की, शिवसेनेचे उध्दव ठाकरेंसोबत आणि राष्ट्रवादीचे पवारांसोबत जायला तयार नाहीत; मग तुम्ही का म्हणतं आहात आम्ही घ्यायला तयार नाही. ते लोक यायला तयार आहेत, असा आभास निर्माण करु नका. त्यांच्यापैकी कोणीही शरद पवार यांच्याकडे जायला तयार नाही. त्यामुळे आता शरद पवारांनी गेलेल्यांना आम्ही पुन्हा साेबत घेणार नाही, अस म्हणू नये.
अजून एक दोन महिने थांबा. ठाकरेंसोबत शिवसेनेत पाचऐक लोक शिल्लक राहतील. तिथे नेतेही, खासदारही आणि आमदारही राहणार नाहीत. मुख्यमंत्री असताना आपण काय दादागिरी केली, तु्म्ही किती फिरला, कोणाच्या संपर्कात राहीला, कोणाच्याही संपर्कात राहीला नाही, हुकूमशाहीसारख घरात बसायच आणि काम करायची. त्यामुळे नेते त्यांच्यावर नाराज होते, असा आराेप करत बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, असेही महाजन म्हणाले.
हेही वाचा