पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्यातील आयपीएलमधील वादाची आजही चर्चा होते. दोघांमध्ये झालेल्या वादाने भारतीय क्रिकेट विश्वच ढवळून निघालं होतं. आता पुन्हा त्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि श्रीशांत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. (Gambhir vs Sreesanth) त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच गौतम गंभीरने सूचक पाेस्ट करत श्रीसंतला डिवचलं आहे. तर एक व्हिडिओ पोस्ट करत श्रीसंतने गाैतम गंभीरवर गंभीर आराेप केले आहेत. जाणून घेवूया या दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 मध्ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रीशांतच्या चेंडूवर गंभीरने चौकार मारले. तेव्हा श्रीसंतने गंभीर याच्याकडे रागाने पाहिले. त्यावरून दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली. दोघेही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस देत जवळ आले. मात्र, सहकारी खेळाडूंनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केल्याने पुढील अनर्थ टळला. या सामन्यानंतर श्रीसंतने गौतमवर गंभीर आरोप केले तर. गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट केली . त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसून, हे श्रीशांतला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे.
गंभीरने गुरुवारी सकाळी 11:30 वाजता X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचे हे चित्र आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले- स्माईल! जेव्हा जगातील लोक फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात.
इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात गौतम गंभीरने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्याने ७ चौकार आणि १ षटकार पटकावला. कॅपिटल्सने 20 षटकांत सात गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 211 धावाच करू शकला. सामना संपल्यानंतर, जेव्हा कॅपिटल्सने जायंट्सला पराभूत करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान निश्चित केले, तेव्हा श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने गौतम गंभीर यांच्यावर आरोप केले.
पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये श्रीशांत याने म्हटलं आहे की, मिस्टर फायटरसोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्ट करायचे होते. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा आणि वीरूभाई (वीरेंद्र सेहवाग)सह अनेक लोकांचाही आदर करत नाही. नेमकं तेच झालं. कोणतीही चिथावणी न देता तो माझ्याशी काहीतरी बोलत राहिला. त्याचे वागणे अत्यंत असभ्य होते. .
या सामन्यादरम्यान गंभीरने त्याला काय सांगितले होते ते मी उघड करणार असल्याचे श्रीशांतने सांगितले. गौतम गंभीर याने वापरलेल्या शब्दांमुळे माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे मन दुखावले. 'ही माझी चूक नाही. त्याने वापरलेले शब्द आणि क्रिकेटच्या मैदानावर त्याने सांगितलेल्या गोष्टी मान्य नाहीत हे उशिरा का होईना, तुमच्या लक्षात येईल. मी माझ्या कुटुंबासह खूप सहन काही केले आहे. तुमच्या पाठिंब्याने मी एकट्याने ही लढाई लढली आहे. आता काही लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे. त्याने त्या गोष्टी सांगितल्या ज्या त्याला सांगायला नको होत्या," असे श्रीसंत याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
वेगवान गोलंदाजाने गंभीरवर गंभीर आरोप करताना श्रीसंत याने म्हटले आहे की, तो त्याच्या वरिष्ठांचा तसेच सहकाऱ्यांचा आदर करत नाही. तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांचा आदर करत नसाल तर संघाचे प्रतिनिधित्व करण्यात काही अर्थ नाही. कोणत्याही मुलाखतीत जेव्हा त्याला विराटबद्दल (कोहली) विचारले जाते तेव्हा तो कधीच बोलत नाही, काहीतरी वेगळेच बोलतो. मला त्यापेक्षा जास्त तपशिलात जायचे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की, मी खूप दुखावलो आहे. माझे कुटुंब दुखावले आहे. मी वाईट शब्द वापरलेले नाहीत."