पुढारी ऑनलाईन: भारतीय संस्कृतीत श्रावणाला अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये या महिन्याला अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यापासून अनेक सणांची सुरूवात होते. त्यामुळे या महिन्यात अनेक लोक पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, देवदर्शन आणि उपवास करतात. खासकरून श्रावणात महिला मोठ्या प्रमाणात उपवास करतात. पण हे उपवास करताना महिलांनी तसेच उपवास करणाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी श्रावणात आपण जो आहार घेता तो सकस आणि पोषक असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या दिवसात आपल्या शरीरातील बदल लक्षात घेऊन त्यापद्धतीचा आहार घेणे आवश्यक आहे.
श्रावण महिना हा वर्षा ऋतूमध्ये येतो. या ऋतूमध्ये संसर्गजन्य रोगराईचे प्रमाणही वाढते. तसेच या दिवसात आपला जठराग्नीसुद्धा खूप मंदावलेला असतो. या ऋतूत वातदोष वाढत असल्याचे आयुर्वेदातही सांगितले आहे. त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे या दिवसात स्निग्ध, सात्विक आणि कमी आहार घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर तुमच्या जीवनात नव्या आहारपद्धतीचा किंवा जीवनशैलीचा अवलंब करण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे श्रावण. चला तर जाणून घेऊया श्रावणातील आहारपद्धती…