एनसीईआरटीने एप्रिलमध्ये शालेय शिक्षणाच्या आराखड्याचा मसुदा जाहीर केला होता. त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर आता अंतिम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार येत्या काळात सर्व शिक्षण मंडळांनी सत्र पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना विषयाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर लगेच परीक्षा देता येईल. त्यामुळे एका परीक्षेतून मूल्यमापन होण्याचा ताण कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळेल. मूल्यमापनात कोणतीही तडजोड न करता दहावी-बारावीच्या परीक्षा सोप्या कराव्यात. वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यासाठी सर्वसमावेशक प्रश्नसंच आणि सुयोग्य सॉफ्टवेअर तयार करता येईल, असेही आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.