होवे; पुढारी ऑनलाईन : इंग्लंड महिला आणि भारत महिला क्रिकेट संघात ( ENGW vs INDW 2nd T20 ) झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १ – १ अशी बरोबरी साधली आहे.
भारताकडून शेफाली वर्माने धडाकेबाज फलंदाजी करत ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार कौरनेही ३१ धावांची खेळी करत भारताला शंभरी पार करुन दिली. या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर १४८ धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी बेमाऊंटने ५९ धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. पण, भारताने मोक्याच्या क्षणी विकेट घेत इंग्लंडला १४० धावातच रोखले. इंग्लंडचे ८ फलंदाज बाद झाले. भारताने या सामन्यात ४ फलंदाजांना धावबाद करत उत्तम क्षेत्ररक्षणाचा नुमना पेश केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने इंग्लंडसमोर १४९ धावांचे आव्हान ठेवले. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. भारताच्या अरुंधती रेड्डीने डेनली वॅटला ३ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.
त्यानंतर सलामीवीर टॅमी बेमाऊंटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, नताली सिवर १ धावांवर धावबाद झाली आणि इंग्लंडला ३१ धावांवर दुसरा धक्का बसला.
दोन धक्यानतंर बेमाऊंटने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. तिने हेथर नाईट बरोबर तिसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी इंग्लंडला १० व्या षटकात ८० धावांपर्यंत पोहचवले.
बेमाऊंटने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. दुसऱ्या बाजूने नाईटही तिला चांगली साथ देत होती. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागिदारी रचली.
मात्र दिप्ती शर्माने बेमऊंटला ५९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर त्याच षटकात नाईटही ३० धावांवर धावबाद झाली. इंग्लंडच्या पाठोपाठ दोन विकेट पडल्याने त्यांची अवस्था २ बाद १०६ वरुन ४ बाद १०६ अशी झाली.
यानंतर एमी जोन्स आणि सोफिया डंकली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, डंकलीला स्मृती मानधना आणि दिप्ती शर्माने ४ धावावर धावबाद केले. त्यानंतर थोड्याच वेळाने पूनम यादवने एमी जोन्सला ११ धावावर बाद करुन इंग्लंडला सहावा धक्का दिला.
पाठापोठ विकेट पडल्याने इंग्लंडची धावगती मंदावली. इंग्लंडचे धावा आणि चेंडूतील अंतर वाढत गेले. याच दरम्यान पूनम यादवने ब्रंटला ५ धावांवर बाद करत इंग्लंडला सातवा धक्का दिला.
इंग्लंडला आता ९ चेंडूत १५ धावांची गरज होती. पण, पूनम यादवने आपल्या षटकाचा ४ था चेंडू निर्धान टाकला. त्यानंतर तिच्या ५ व्या चेंडूवर २ धावा झाल्या. तिच्या अखेरच्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही.
अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना स्नेह राणाने फक्त ५ धावा दिल्या. भारताने दुसरा टी २० सामना ८ धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी ७० धावांची सलामी दिली. शेफालीने ४८ धावांची तुफानी खेळी केली. मात्र सलामी जोडी फुटल्यानंतर भारताची धावगती मंदावली.
भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. शेफालीने धडाकेबाज सुरुवात केली. तर स्मृतीने सावध फलंदाजी करत तिला एका बाजूने साथ दिली. या दोघींनी पाच षटकात नाबाद ४९ धावांची नाबाद सलामी दिली. यात शेफालीचा वाटा ३९ धावांचा होता.
पॉवर प्ले संपल्यानंतर स्मृती मानधनानेही आपला गिअर बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. पण, डेव्हिसने तिला २० धावांवर बाद करत ही सलामी जोडी फोडली. त्यानंतर अर्धशतकाजवळ पोहचलेली शेफाली वर्माही पुढच्याच षटकात बाद झाली.
तिला मॅडी व्हिलर्सने ४८ धावांवर बाद केले.शेफाली वर्माने ३८ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या ४८ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. शेफाली बाद झाली त्यावेळी भारताच्या ९.१ षटकात ७२ धावा झाल्या होत्या.
शेफाली बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी १५ व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर शेवटची पाच षटके राहिली असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली.
कौरने ग्लेनच्या षटकात पाठोपाठ चौकार आणि षटकार मारला. मात्र पुढच्याच चेंडूवर ती बाद झाली. हरमनप्रीतने दोन चौकार आणि दोन षटकार खेचत २५ चेंडूत ३१ धावांची खेळी केली.
कौर बाद झाल्यानंतर दिप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी भारताचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. पण, रिचा घोष ८ धावा करुन माघारी परतली. त्यानंतर शर्मा आणि स्नेह राणा यांनी भारताला २० षटकात १४८ धावांपर्यंत पोहचवले.
दिप्ती शर्माने २७ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या तर स्नेह राणाने एका चौकारासह ५ चेंडूत ८ धावांची खेळी केली.
हेही वाचले का?