पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात १५ सप्टेंबर रोजी 'इंजिनिअर्स डे' साजरा करण्यात येतो. अभियांत्रिकी सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात आज अनेक पुरूषांसह महिला देखील तितक्यात क्षमतेने कार्यरत आहेत. या क्षेत्रात अनेक महिला अशा आहेत की त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजच्या 'इंजिनिअर्स डे' निमित्त या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांविषयी अधिक जाणून घेणार आहे. (Engineers' Day 2023)
तंत्रज्ञानातील अग्रगण्य प्रगतीपासून उद्योगांमध्ये मोठी क्रांती घडवून आणण्यापर्यंत अनेक महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महिलांच्या कतृत्वाने अनेक महिलांना प्रगतीचा मार्ग मोकळा केला. तसेच या पुरूषप्रधान क्षेत्रात महिला प्रतिनिधित्वाची परिवर्तनशील शक्ती दाखवली. आज आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी दिनानिमित्त भारतातील पहिल्या नऊ महिला 'इंजिनिअर्सं'च्या अमूल्य योगदानाविषयी अधिक जाणून घेऊयात याविषयी…(Engineers' Day 2023)
ए. ललिता या पहिल्या भारतीय महिला इंजिनिअर होत्या. अभियांत्रिकी हे नेहमीच पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते. पण चार महिन्यांच्या मुलीसह किशोरवयीन विधवा होण्यापासून ते भारतातील पहिली महिला विद्युत अभियंता बनण्यापर्यंतचे ए. ललिताचे आयुष्य एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. सामाजिक दबावाखाली कठोरपणे निर्बंधित जीवन जगण्याऐवजी त्यांनी अभियांत्रिकी या पुरुषप्रधान क्षेत्रात करिअर केले. 1940 मध्ये महाविद्यालयात पहिली विद्यार्थिनी म्हणून प्रवेश मिळवून, त्यांनी 1944 मध्ये इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली. त्यांनी जगाला दाखवून दिले की ती सामाजिक अडथळ्यांवर मात करू शकते. यामुळे असंख्य महिलांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा दिली.
लिलाम्मा जॉर्ज कोशी यांनी 1944 मध्ये वायाच्या 19 व्या वर्षी, COE गिंडी येथून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. पदवीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाल्यामुळे त्या केरळच्या पहिल्या महिला अभियंता झाल्या. त्यांनी त्रावणकोरच्या महाराणीच्या प्रायोजकत्वाने शहर नियोजनाचा अभ्यास करून, पुढचे शिक्षण इंग्लंडमध्ये केले. कोशीच्या समर्पण आणि पायनियरिंगच्या भावनेने मैदानावर कायमचा प्रभाव टाकला.
पीके थ्रेशिया या भारतातील पहिल्या महिला अभियंत्यांपैकी एक आहेत. सीओई गिंडी येथे ललिता यांच्यानंतर एका वर्षाने सिव्हिल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी त्या सामील झाल्या. ललिता आणि लिलाम्मा यांच्यासह भारतातील पहिल्या महिला अभियंत्यांचा समावेश असलेल्या तिघिंपैकी त्या एक होत्या. 1944 मध्ये पदवीधर झाल्यानंतर थ्रेशियाची उल्लेखनीय कामगिरी तिथेच थांबली नाही. आशिया खंडातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदावर विराजमान होणारी ती पहिली आणि एकमेव महिला ठरली.
राजेश्वरी चॅटर्जी
राजेश्वरी चॅटर्जी यांनी गणित आणि भौतिकशास्त्राच्या आवडीमुळे विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली, त्यानंतर त्या कर्नाटकातील पहिल्या महिला अभियंता बनल्या. त्यांनी युनायटेड स्टेट्समध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. 1953 मध्ये, प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये चॅटर्जी त्यांच्या विभागातील एकमेव महिला प्राध्यापक बनल्या. त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्या इच्छुक महिला अभियंत्यांसाठी एक उल्लेखनीय उदाहरण ठेवले.
अनुराधा टीके यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मधील पहिली महिला उपग्रह प्रकल्प संचालक म्हणून इतिहास रचला. GSAT-12 आणि GSAT-10 सारख्या उपग्रह प्रक्षेपणांमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन, अनुराधा यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा हा उल्लेखनीय प्रवास 1982 मध्ये सुरू झाला आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीची 34 वर्षे इस्रोला समर्पित केली आहेत.
भारतातील सर्वात प्रख्यात महिला सिव्हिल इंजिनिअर्सपैकी शकुंतला भगत या एक आहेत. शकुंतला भगत यांचे अभियांत्रिकी कौशल्य आणि दूरदृष्टीमुळे 'क्वाड्रिकॉनचा' शोध लागला. ज्याचा जगभरात 200 पुलांची रचना करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. क्वाड्रिकॉन मॉड्युलर ब्रिज सिस्टीम आणि भगत युनिशीअर कनेक्टर्सच्या त्या शोधक आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. भगत यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना 1993 मध्ये 'वुमन इंजिनिअर ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले आहे.
इला घोष यांच्या अभियांत्रिकीच्या आवडीमुळे त्या पश्चिम बंगालमधील पहिल्या भारतीय महिला अभियंता बनल्या. बंगाल अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. 1985 मध्ये युनेस्कोने ढाका, बांगलादेश येथे महिला पॉलिटेक्निकची स्थापना करण्यासाठी घोष यांच्याशी संपर्क साधला, ज्यामुळे अभियांत्रिकीमधील महिलांच्या शिक्षणावर त्यांचा प्रभाव वाढला.
सुधीरा दास यांनी अशावेळी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे की, सामाजिक नियमांचे उल्लंघन म्हणजे स्त्रियांसाठी महाकठीण होते. गणिताची आवड असल्याने त्यांनी 1956 मध्ये रेडिओ फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि त्या ओडिशातील पहिल्या महिला अभियंता बनल्या. दास यांनी भुवनेश्वरमध्ये महिला पॉलिटेक्निकची स्थापना केली. ज्यामुळे महिलांना डिप्लोमा प्रोग्राम उपलब्ध करून दिला आणि त्यांना तांत्रिक शिक्षणापर्यंत पोहोचवले.
टेसी थॉमस 1988 मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये सामील झाल्या. त्यांनी अग्नी मालिकेसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या डिझाइन आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानामुळे तिला एरोनॉटिकल सिस्टीम्सचे महासंचालक पद मिळाले आणि क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ बनल्या.