मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणार्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील 23 आठवड्यांकरीता हा उपक्रम सुरू राहणार आहे. अंड्याचा सध्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रूपये दर निश्चित करण्यात आला आहे.