![दत्तवाड येथे दूधगंगा नदीचे पात्र आठवड्यात दुसऱ्यांदा कोरडे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2Fkolhapur.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र आठवड्यात दुसऱ्यांदा कोरडे पडले आहे. मार्चच्या सुरुवातीस दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले होते. आठवड्या भरापूर्वीच नदीपत्रात पाणी आले होते. मात्र, हे पाणी आठ दिवसातच संपल्याने शेतकरी वर्ग हवालदिन झाला आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके जगवायची कशी? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
संबंधित बातम्या
नदीपात्रातील पाणी संपल्याने दतवाडसह घोसरवाड नवे व जुने दानवाड, टाकळीवाडी आदी गावांचा पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. घरगुती पाण्याची गरज भागवण्यासाठी नागरिकांना पुन्हा विहिरी कुपनलिका व बोरवेलचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, वारंवार नदीपात्रातील पाणी संपू लागल्याने विहिरी व बोरवेलची पाण्याची पातळी ही खालावत चालली आहे.
दूधगंगा धरणातून पाणी सोडल्यानंतर कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक गावात पाणी अडवले जाते. त्यामुळे पाणी फार अल्प प्रमाणात दत्तवाडपर्यंत पोहोचते. त्यातच उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची गरज ही वाढली आहे. त्यामुळे आलेले पाण्याची जलद गतीने उपसा होत आहे. दूधगंगा नदी काठावरील कर्नाटक व महाराष्ट्रातील गावात अडवले जाणारे पाणी नेहमी प्रवाहित केले पाहिजे व दत्तवाड हे दूधगंगा नदी काठावरील शेवटचे गाव असल्याने येथे पाणी अडवण्याची भक्कम उपाय योजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्वांनाच पाणी उपलब्ध होऊ शकेल व आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यात येईल.
सध्या दुधगंगा नदीवर अद्याप कोणत्याही मोठ्या योजना कार्यान्वित नाही, तरी देखील अशी परिस्थिती आहे. तर मग कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन, गांधीनगरसह १३ गावांना कागल येथून सुरू होणारी योजना तसेच इचलकरंजीसाठी मंजूर झालेली योजना कार्यान्वित झाल्या तर दूधगंगा नदी काठाची काय परिस्थिती होईल? याची भीती दूधगंगा नदी काठावर भेडसावत आहे.
दत्तवाड मलिकवाड व दत्तवाड एकसंबा बंधाऱ्यातील बर्गे निकामी झाले आहेत. त्यामुळे पाणी आले तरी या बर्ग्यातून पाणी पुढे निघून जाते. त्यामुळे दत्तवाड ग्रामपंचायतीने व पाटबंधारे खात्याने या दोन्ही बंधाऱ्यावरील बर्गे नवीन बसवणे गरजेचे आहे. तसेच दत्तवाड सदलगा पुलाजवळही पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.