पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात तणावाचे वातावरण पसरले आहे. कन्नड वेदिकेच्या कार्यकत्यांनी आज (दि.६) बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा वाहनांची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून एसटी बस कर्नाटक राज्यात पाठवू नये, अशी विनंती महाराष्ट्र पोलिसांनी एसटी महामंडळाला केली आहे. कर्नाटकात तोडफोडीची शक्यता लक्षात घेऊन बसेस पाठवू नये, असेही पोलिसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी सीमा भागासह राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
बेळगाव दौ-यावर असलेल्या कन्नड वेदिकेचे अध्यक्ष नारायण गैडा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्रातील सहा वाहनांची हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आली. याची गंभीर दखल महाराष्ट्र्र पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. तातडीने राज्यासह सीमा भागातून जाणा-या महामार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी दिली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचेही भारंबे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?