पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेता, कसीनथुनी विश्वनाथ यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांचे निधन हैदराबादमध्ये अपॉलो रुग्णालयात झाले. त्यांना 'के विश्वनाथ' (Vishwanath Garu) नावाने ओळखले जायचे. ते तेलुगु चित्रपट इंडस्ट्रीचे प्रसिद्ध कलाकार होते. कसीनथुनी विश्वनाथ यांच्या निधनानंतर साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. (Vishwanath Garu)
कसीनथुनी विश्वनाथ यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ७ राज्यनंदी पुरस्कार, १० दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार आणि हिंदीमध्ये एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
त्यांना १९८१ मध्ये "फ्रान्स केबेसनकॉनफिल्म फेस्टिव्हल" मध्ये "जनता का पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांना आंध्र प्रदेश राज्यरघुपति वेंकैया पुरस्कार आणि नागरिक सन्मानदेखील मिळाला होता. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी १९९२ मध्ये 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २०१७ मध्ये भारतीय चित्रपटामधील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
विश्वनाथ यांनी एक ऑडिओग्राफर म्हणून चित्रपट करिअरची सुरुवात केली आणि गेल्या साठ वर्षांमध्ये, त्यांनी प्रदर्शन कला, दृश्य कला आणि सौंदर्य शास्त्रावर आधारित ५३ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होतं. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनीही आपल्या ट्विटरवर ट्विट करून विश्वनाथ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कसीनथुनी विश्वनाथ यांच्या निधनानंतर तेलंगानाचे मुख्यमंत्री केसीआर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, अनेक मंत्री, फिल्म जगतच्या दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.