पुढारी ऑनलाईन डेस्क : "कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो." असं म्हणत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी (दि.२०) शरद पवारांवर केलेलल्या टीकेचे स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Dilip Walse Patil)
सध्या माझ्यावर आरोप केला जातो की ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची नोटीस आली म्हणून मी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मला कुठल्याही एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणाला त्या नोटीस सापडल्या तर त्यांनी त्या माझ्याकडे आणाव्यात. एकही नोटीस आलेली असेल तर मी उद्याच आमदारकीचा राजीनामा देईन. माझ्या द़ृष्टीने मंत्रिपद, मान या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. माझ्यासाठी तालुक्यातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे, असे वळसे-पाटील म्हणाले होते.
वळसे-पाटील यांनी रविवारी (दि.२०) शरद पवार यांच्याशी संबंधित केलेल्या वक्तव्याचे संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या. आज (दि.२१) त्यांनी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे. माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला."
हेही वाचा