पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आज भारतभर, ग्रामीण भारत बंदचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सत्यशोधक शेतकरी संघटना व श्रमिक शेतकरी संघटना यांनी साक्री येथे शेवाळी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक बंद केली. एक हजाराच्या जवळपास मोर्चेकरी यावेळी रस्त्यावर होते. वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मोर्चामध्ये शेती उत्पादित सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च आणि 50 टक्के नफा असा भाव मिळावा. स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारशी लागू करा, लहान मध्यम शेतकरी कुटुंबांची सरसकट कर्ज माफी करावी, कामगारांना 26000 किमान वेतन द्यावे. चार श्रमसंहिता कामगार विरोधी आहेत त्या रद्द करा, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा, शिक्षण आरोग्य यांचे खाजगीकरण करू नका, मनरेगा मध्ये 200 दिवस काम व सहाशे रुपये दररोज वेतन द्या. वनहक्क कायदा 2006 प्रमाणे ज्या दावेदारांनी दावे दाखल केलेले आहेत त्यांना सातबारा उतारा द्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बिढार मोर्चाला दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करा. प्रलंबित दाव्यांची स्थळ पहाणी व जीपीएस मोजणी करून दावे ताबडतोब पात्र करा. दिल्ली सरहद्दीवर अडीच वर्षांपूर्वी सातशे पेक्षा जास्त शहिदांच्या नातेवाईकांना भरपाई द्या. साठ वर्षापेक्षा वृद्ध शेतकरी शेतमजुरांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्या. शेती बाबत दुष्परिणाम करणारी आयात निर्यात धोरणे ताबडतोब थांबवा आदी 25 मागण्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना साक्री तहसीलदारांमार्फत देण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारले. या निवेदनावर कॉम्रेड सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, मन्साराम पवार, अश्फाक कुरेशी, यशवंत माळचे, मेरुलाल पवार, पवित्राबाई सोनवणे, लालाबाई भोये, दिलीप ठाकरे, उत्तम महिरे, रामलाल गवळी, रमण माळवी, राकेश भोसले, कुमाऱ्या सोनवणे, निंबाबाई ब्राह्मणे, जीवन गावीत, काळू अहिरे, दिलीप गावित इत्यादी 50 कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा :