कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत काँग्रेसकडून फसवणुकीचे उद्योग सुरू आहेत, अशी टीका खा. धनंजय महाडिक यांनी केली.
मैत्रीण फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 'मैत्रीण महोत्सव' कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खा. महाडिक म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नर्व पर्व सुरू आहे; मात्र काही राजकारणी चंद्रावर, सूर्यावर गेल्याचे सांगत हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत आहेत. तामगाव रस्त्यासाठी निधी आणल्याचा एका काँग्रेस आमदाराचा फलक लागल्याचे पाहिले. भाजपची सत्ता असताना निधी आणल्याचे सांगून काँग्रेस आमदार फसवत आहेत.
भाजपने आधी केले मग सांगितले. नकाते यांच्या प्रभागात 1 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. निवडणुका नसतानाही सातत्याने काम करून समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत आणखी दीड कोटी रुपयांच्या निधीतून फुटबॉल टर्फ, उद्यान, रस्ते आदी कामे मार्गी लावली जातील, असे ते म्हणाले.
उद्घाटनानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोलो नृत्य, लावणी व इतर मराठी, हिंदी गीतांवरील कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी रामलल्ला मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त कोल्हापुरात आणलेल्या मंगल कलशाचे खा. महाडिक यांच्या हस्ते पूजन झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते, माजी महापौर सुनील कदम, भाजपचे अशोक देसाई, अमर नकाते आदी उपस्थित होते.