मुंबई, पुढारी ऑनलाईन : "राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. महाघोटाळा झाला म्हणूनच त्याची चौकशी सुरू झाली. बदल्यांचा महाघोटाळा दाबून ठेवण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं. सभागृहात सरकारविरोधात विषय मांडत असल्यानेच मला अचानक नोटीस पाठविण्यात आली. मला पाठवलेले प्रश्न आणि विचारण्यात आलेले प्रश्न यामध्ये फरक आहेत. मला सहआरोपी बनवता येईल का, असे प्रश्न पोलिसांनी मला विचारले. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यासारखे प्रश्न विचारले. जणू मी कायदा मोडला, असाच या प्रश्नांचा रोख होता", असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केले.
दाेन तासांच्या पोलीस चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. पेन ड्राईव्हमधील माहिती बाहेर पसरवली नाही. मी स्वतः पोलीस ठाण्यात जाणार होतो. मला कितीही अडकविण्याचे प्रयत्न केले तरीही मी गप्प बसणार नाही. गुप्त अहवाल मलिकांनी पत्रकारांना कसा दिला? गृहमंत्र्यांनी काहीही सांगितलं तरी मला माझे अधिकारी मला माहीत आहेत. राज्य सरकारचे मनसुबे काहीत पूर्ण होणार नाहीत. आमचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढून नयेत, यासाठी असे बनाव केले जात आहेत", असंही फडणवीस यांनी सांगितले.
"राज्य सरकारचे आणखी घोटाळे बाहेर नयेत, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून दबावाचं काम केलं जात आहेत. पोलिसांनी मला पुन्हा येईन, असं अजूनतरी सांगितलेलं नाही. अधिकाऱ्यांवरही दबाव टाकला जात आहे. स्टिंग ऑपरेशनसंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत", असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?