पणजी : पुढारी वृत्तसेवा – राज्याच्या सहकार क्षेत्रात सद्यस्थितीत पाच हजारांपेक्षा अधिक युवक-युवती कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सहकार क्षेत्रातील डिग्री किंवा डिप्लोमा पदवी नाही. (Goa News) त्यासाठीच येत्या वर्षापासून राज्यातील युवक-युवतींना राज्यातच सहकारातील डिग्री आणि डिप्लोमा पदवी मिळवून देण्यात येणार आहे. (Goa News)
बाहेरून गोव्यात आलेल्या आणि पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सहकारी सोसायट्यांवर गोमंतकीय जनतेने अजिबात विश्वास ठेवू नये. राज्यात प्रस्थापित असलेल्याच सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवावे. ओळखीच्या व्यक्तींसोबतच आर्थिक व्यवहार करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सहकार सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. परराज्यांतून गोव्यात आलेल्या अनेक सहकारी सोसायट्यांनी गोमंतकीय जनतेला कोट्यवधी रुपयांना लुटल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. काहीच महिन्यांपूर्वी अशाच एका सोसायटीने शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचा सहकारी सोसायट्यांवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे सहकारी सोसाट्यांच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेचा विश्वास जपावा आणि पारदर्शक कारभार करून सोसायट्या बुडण्यापासून वाचवाव्या, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
दरम्यान, सहकार क्षेत्राला बळकटी मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता स्थापन होताच सहकार मंत्रालयाची स्थापना केली. या मंत्रालयाचा फायदा संपूर्ण देशाला होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याच्या सहकार क्षेत्रात सद्यस्थितीत पाच हजारांपेक्षा अधिक युवक-युवती कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सहकार क्षेत्रातील डिग्री किंवा डिप्लोमा पदवी नाही. त्यासाठीच येत्या वर्षापासून राज्यातील युवक-युवतींना राज्यातच सहकारातील डिग्री आणि डिप्लोमा पदवी मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने गोवा विद्यापीठाशी करारही केला आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली