नानगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीपात्रात सापडलेल्या त्या सात मृतदेहांपैकी अंत्यविधी केलेले तीन मृतदेह २६ जानेवारी रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. हे शवविच्छेदन उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या पाच दिवसांपूर्वी पवार व फुलवरे यांच्या दोन कुटुंबातील सात जण सामूहिक हत्याकांडाला बळी पडले होते. पवार, फुलवरे दांपत्य आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात टाकून देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली होती. या प्रकरणात मयतांचे पाच नातेवाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना एक फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यातील अगोदर सापडलेले तीन मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यावर हे मृतदेह यवत येथे दफन करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाने हत्याकांडाचे गंभीर वळण घेतल्यानंतर पुन्हा या मृत व्यक्तींचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा काय अहवाल येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.