Dam water : राज्यातील धरणांमध्ये केवळ 19 टक्के पाणीसाठा!

Dam water : राज्यातील धरणांमध्ये केवळ 19 टक्के पाणीसाठा!

कोल्हापूर, सुनील कदम : Dam water :  राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा सर्व प्रकारच्या धरणांमध्ये मिळून अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 25 धरणे कोरडीठाक पडली असून 37 धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे. अन्य धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आणखी आठ-दहा दिवस पाऊस लांबला, तर राज्याच्या घशाला कोरड पडणार आहे.

राज्यातील 139 मोठ्या, 260 मध्यम आणि 2594 लहान अशा 2993 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 48017.62 दशलक्ष घनमीटर (1695.71 टीएमसी) एवढी आहे. मात्र, या सर्व धरणांत मिळून 9282.97 दशलक्ष घनमीटर (327.82 टीएमसी) एवढाच म्हणजे केवळ 19 टक्के पाणीसाठा दि. 21 पर्यंत शिल्लक होता. सध्या राज्यातील खडकपूर्णा, बोरगाव-ऐनापूर, शिरसमार्ग, वांगदरी, सिद्धेश्वर, गुंजरगा, किल्लारी, लिंबाळा, मदनसुरी, राजेगाव, सीना-कोळेगाव, तगरखेडा, भुसनी, बिंदगीहाळ, कर्सा-पोहरेगाव, साई, टाकळगाव-देवळा, भाम, तीसगाव, वाकी, दूधगंगा, पिंपळगाव-जोग, घोड, लोणावळा आणि उजनी ही धरणे एक तर कोरडीठाक पडली आहेत किंवा त्या धरणातील पाणी मृतसंचय पातळीच्या खाली गेले आहे. परिणामी, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या अनेक गावांमध्ये 'पाणीबाणी' निर्माण झाली आहे. परिसरातील बहुतांश नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे. Dam water

आपेगाव, धानेगाव, डोंगरगाव, रोशनपुरी, आगदुरा, दिगडी, हिरडपुरी, जोगळादेवी, किनवट, लोणीसावंगी, मांगरूळ, मुदगल, राजटाकळी, औरद, खुलगापूर, नागझरी, शिवनी, वांजरखेडा, कावडस, डोलनहाळ, लोअरचोंधे, घाटघर, कालीसरार, सिदपूर, नंद, मुसळवाडी, भावली, चंकपूर, कडवा, पालखेड, वाघर, तिल्लारी, तुळशी, नीरा-देवधर, वडज, टेमघर, वलवण आणि कुंडली या धरणानेही तळ गाठला आहे. आगामी काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही, तर ही धरणेसुद्धा कोरडी पडण्याचा धोका आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या कोयना धरणात फक्त सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील काही प्रमुख धरणांमध्ये तर केवळ अर्धा ते एक टीएमसी किंवा त्याहून कमी एवढाच पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 11 टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात धरणांची संख्या जास्त असली, तरी पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 720 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1783.40 दशलक्ष घनमीटर (62 टीएमसी) पाणीसाठा आहे. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि नागपूर विभागातील धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्थाही चिंताजनक आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या धरणांमधील पाणीसाठा जवळपास दहा टक्क्यांनी जादा होता. Dam water

कोयना धरणातील शिल्लक 6 टीएमसी पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा लागेल. परिणामी, नजीकच्या काही दिवसांतच कोयनेच्या वीजनिर्मितीवर विपरीत परिणामाची शक्यता आहे.

राज्याच्या बहुतांश भागातील पेरण्याची कामे खोळंबली आहेत. कोकण पट्ट्यातील काही भागांत करण्यात आलेल्या भाताच्या पेरण्याही पावसाअभावी धोक्यात आल्याच्या दिसत आहेत. दोन-चार दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही, तर या धूळवाफ पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

Dam water : शेती आणि उद्योग-व्यवसायांना पाणी मिळणे कठीण

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह अन्य काही जिल्ह्यांत यापूर्वीच शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे. लवकरच औद्योगिक वापरासाठीच्या पाण्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अनेक कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news