पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ रविवारी (दि.३) सकाळी ११.३० च्या सुमारास तयार झाले आहे. त्याचा पुढे प्रवास सुरू असून .ते अधिक तीव्र रूप धारण करत आहे. दरम्यान 'मिचौंग' चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिणेकडील अनेक राज्यांत दिसून येत आहे. आज सकाळपासून तमिळनाडूसह चेन्नईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरूवात केली . दरम्यान या चक्रीवादळाचा प्रवास चेन्नईच्या दिशेने सुरू झाला आहे. सोमवारी ते उत्तर तमिळनाडूत आणि दक्षिण आंध्रप्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि पद्दुचेरीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने सुरूवात केली आहे. (cyclone michaung live)
सध्या हे 'मिचौंग' चक्रीवादळ चेन्नईपासून 230, पुद्दुचेरीपासून 250, नेल्लोरपासून 350 किलोमीटरवर आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनार्याजवळ चक्रीवादळ मिचौंग येताना सोमवारी (दि.४) रात्री चेन्नईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील २४ तासांत चेन्नई शहरासह शेजारील जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. (cyclone michaung live)
चेन्नई शहरात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागात पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरात मुसळधार पावसानंतर पाणी साचल्यामुळे अडकलेल्या पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम परिसरातून सुमारे १५ लोकांना वाचवण्यात एनडीआरएफ यश मिळाले आहे.
'मिचौंग' हे चक्रीवादळ सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात आहे. हळूहळू ते वायव्येकडे सरकत राहण्याची शक्यता आहे. तसेच ते आणखी तीव्र होऊन दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सोमवारी दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढे चक्रीवादळ मिचौंग हे मंगळवारी (दि.५) दुपारी १०० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
चक्रीवादळ 'मिचौंग' पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुद्दुचेरीच्या सागरी किनार्याजवळील पुद्दुचेरी जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समुद्र किनाऱ्यालगत व्यक्तींच्या प्रवेशाला बंदी घातली आहे.