![WTC फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवा, R Ashwin ची मागणी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FUntitled-design-20.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final) ठिकाणाबाबत प्रश्न उपस्थित करत भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनाही या महत्त्वाच्या सामन्याचे यजमानपद द्यावे, अशी मागणी त्याने केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आयसीसी फायनलसाठी योग्य असेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
अश्विनने (R Ashwin) त्याच्या यूट्यूब चॅनेलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो की, 'गेल्या दोन डब्ल्यूटीसी फायनल मॅच इंग्लंडमध्ये खेळल्या गेल्या. 2025 मध्येही तिस-यांदा इंग्लंडमध्येच स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. पण आता ते ठिकाण बदलावे का? भारत किंवा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर अंतिम सामन्याचे आयोजन का नाही? भारतात नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे आणि एका उत्कृष्ट अंतिम सामन्याचे येथे आयोजन होऊ शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटले? दुसऱ्या एका व्यक्तीने गुणतालिकेत जो संघ अव्वल स्थानी असेल त्यांच्या देशात अंतिम सामना खेळण्याचा सल्ला दिला. ही देखील चांगली कल्पना आहे. पण जूनमध्ये ऑस्ट्रेलियन हवामान थोडेसे निस्तेज असते, त्याची आम्हाला माहित नाही,' असे त्याने मत मांडले आहे.
भारताने आतापर्यंत झालेल्या दोन्ही डब्यूटीसी फायनल (WTC Final) खेळल्या आहेत. 2021 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी झाला होता, तर दुसऱ्यांदा 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत झाली होती. मात्र, दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा हंगाम सुरू आहे. अश्विनला आशा आहे की, टीम इंडिया या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची हॅट्ट्रीक करेल. कारण सध्याच्या डबल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे.
अश्विन (R Ashwin) पुढे म्हणाला, 'भारताला अजून तीन मालिका खेळायच्या आहेत. यातील दोन मालिका मायदेशात आणि एक मालिका परदेशात खेळायची आहे. ऑस्ट्रेलियन संघाचेही असेच आहे. हे सर्व पाहता, मला वाटते की आणखी एक डबल्यूटीसी फायनल (WTC Final) आमची वाट पाहत आहे,' असा विश्वास त्याने व्यक्त केला.