![Coromandel Express](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाइन डेस्क : कोरोमंडल एक्सप्रेसची सेवा आज बुधवारपासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले कोरोमंडल एक्सप्रेस बुधवारपासून तिची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. शुक्रवारी (दि.2) बालासोर येथी बहनगा रेल्वे स्थानकाजवळील रूळावरून डबे घसरल्याने कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर 5 दिवसांनी कोरोमंडल पुन्हा सेवेत दाखल होणार आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस शालिमारहून चेन्नईला रवाना होईल. दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य चौधरी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. कोरोमंडल एक्सप्रेस दुपारी 3.20 वाजता शालिमारहून चेन्नईसाठी सुटेल. ही ट्रेन पूर्वीप्रमाणेच त्याच मार्गावर धावणार असल्याचे आदित्य चौधरी यांनी सांगितले. कोरोमंडल एक्सप्रेस बुधवारी दुपारी 3.20 वाजता शालीमार येथून चेन्नईसाठी सुटेल, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
ओडिशातील बालासोर येथील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि.2) सायंकाळी 7 च्या सुमारास सुरुवातीला कोरोमंडल एक्सप्रेसचे 10 ते 12 डबे घसरून विरुद्ध रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले. त्यानंतर यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी हावडा एक्प्रेस वेगात असल्याने कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन धडकली. त्यामुळे तिचेही डबे घसरून रेल्वे इतिहासातील आतापर्यंतचा भीषण तिहेरी रेल्वे अपघात घडला.
दरम्यान, अपघातानंतर शनिवारी दुपारपर्यंत बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर रेल्वे ट्रॅक दुसरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तब्बल 1000 मनुष्यबळ, 7 पोलकेन मशीन इत्यादींच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवरील अपघातग्रस्त डब्यांच्या मलबा उपसण्यात आला. तर दुसरीकडे द्रूतगतीने रेल्वे रूळ दुरुस्त करण्यात आले. या कालावधीत या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, बालासोरमध्ये रेल्वे अपघातानंतर 51 तासांनंतर सेवा पुन्हा सुरू झाली. या मार्गावरून सर्व प्रथम मालगाडीला हिरवा सिग्नल देण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी संध्याकाळी मालगाडीच्या क्रूला ओवाळले आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना केली. दोन्ही मार्गावरील सेवा 51 तासानंतर रविवारी पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्या दिवशी 40 हून अधिक गाड्या त्या मार्गावरून धावल्या. मात्र, अपघातस्थळी ट्रेनचा वेग ताशी केवळ 10 किमी होता. बुधवारी रद्द झालेल्या गाड्यांची संख्या चार असेल. या मार्गावरून सोमवारी हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मार्गस्थ झाली.
हे ही वाचा :