पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला प्रेम दिले, हँडग्रेनेड दिले नाही. निर्भयपणे जगणं हे मी महात्मा गांधी यांच्यापासून शिकलो आहे.मी विचार करत होतो की, काश्मीरमध्ये पोहोचल्यावर माझ्या टी शर्टचा रंग लाल होईल. परंतु जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला प्रेम दिले, हँडग्रेनेड दिले नाही. मला भरभरून प्रेम दिले. मला आपले मानले, प्रेमाच्या अश्रूंनी माझे स्वागत केले, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.३०) भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोप प्रसंगी नमूद केले.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप (Bharat Jodo Yatra) सोहळा श्रीनगरमधील 'शेर ए काश्मीर' या मैदानावर आज झाला. बर्फवृष्टी सुरू असताना ध्वजारोहण सोहळा झाला. त्यानंतर रॅली काढण्यात आली. यावेळी काश्मिरी नेते व नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या मेहबूबा मुफ्ती यांनी भाषण केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांचेही यावेळी भाषण झाले. .
काँग्रेस नेतृत्वाशिवाय विरोधी पक्षांचे डझनभर नेते या रॅलीत सहभागी झाले होते. तथापि, बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागला आहे. त्यामुळे हवाई वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी 21 पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि टीडीपीचे नेते उपस्थित राहिले नाहीत. श्रीनगरमध्ये आज यात्रेची अधिकृत सांगता झाली.
हेही वाचलंत का ?