पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंम्मत असेल तर ४८ तासांमध्ये मातोश्रीत या, असे आव्हान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आज दिले. ठाण्यातील शक्तीस्थळावरून महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलल्यास मातोश्रीतून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला होता. याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी अंधारे म्हणाल्या की, राज्याच्या गृहमंत्र्यांना ऐकू येत नाही. फडतूस शब्द उच्चारल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना राग आला. मात्र, मी तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हणते. तरीही तुमच्या आमदारांकडून माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होते. त्याच्यावर तुम्ही कारवाई केली का? असा सवालही त्यांनी केला.
२०१६ चा फोटो काढून सोलापूरचा ठाकरे गटाचा कार्यकर्ता अतुल भवरला अटक केली जाते. मी स्वत: परळी पोलीस स्टेशनला गेले. मात्र, माझी तक्रार नोंदवली गेली नाही. त्याचवेळेला म्हात्रे प्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले, असा आरोपही अंधारे यांनी केला.