ठाणे; पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीला पंढपूरमधील विठ्ठलाची मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. त्यावेळी वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवले जाते. मात्र यंदा शासकीय पूजा सुरू असताना दर्शन बंद न ठेवता वारकऱ्यांना आपल्या माऊलीचे मुख दर्शन घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (२५ जून) ठाण्यात केली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी पूजा सुरू असताना विठ्ठलाचे दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. ते पुढे म्हणाले, आपल्या १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखांचा विमा (CM Eknath Shinde) काढण्यात आल्याचे सांगितले.
मी एखादे काम मनात घेतले की ते आरपार करतो, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील समृध्दी महामार्ग होऊ नये म्हणून, काहीजण प्रयत्न करीत होते. तरीदेखील पर्यावरणपूरक रस्त्याचे काम सुरू झाले. या रस्त्याचे काम अद्याप सुरू असून, ठाण्यापर्यंतचा रस्ता डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होईल, असे जाहीर करताना या रस्त्यावर ३३ लाख झाडे लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लागली असून, आता विरोधक रस्ते काँक्रिट रस्त्याच्या कामाचे हिशोब मागत आहे. तुम्ही रस्ते काँक्रीटचे बनविले असते तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी वाचले असते, खड्डेमुक्त प्रवास झाला असता, बळी गेले नसते, त्याचा ठाकरे यांनी हिशोब द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना याप्रसंगी केले. कोरना काळात मयताची बॅग ही ६०० रुपयाला मिळत असताना ती सहा हजार रुपयांना खरेदी केली, त्याचा हिशोब द्यावा लागेल. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.