मोतिहारी; वृत्तसंस्था : जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भाजपसोबतची 'मैत्री' कायम राहील, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले. महात्मा गांधी सेंट्रल युनिर्व्हसिटीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत घरोबा करून बिहारमध्ये सत्ता स्थापना केली आहे. इंडिया या विरोधी आघाडीचेही ते निमंत्रक आहेत. दीक्षांत समारंभात बोलताना त्यांचे भाजपप्रेम पुन्हा जागृत झाले आहे. ते वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहोत. मात्र मी जिवंत असेपर्यंत मैत्री कायम राहील, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या मैत्रीला उजाळा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनीही नितीशकुमार यांच्यासोबत वैयक्तिक वैर नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भाजप तत्त्वानुसार काम करतो. नितीशकुमारांच्या मैत्रीच्या विधानाबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.