राज्यात भाजप लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मिशन लोकसभा 2024 अंतर्गत कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा महाविजय 2024 मिशन अंतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात संपर्क आणि समर्थन अभियान सुरू आहे. त्याला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शंभर वॉरियर्समार्फत 60 हजार घरापर्यंत जािऊन सरकारच्या योजना सांगत अहोत. प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळावीत यासाठी या अभियानात विशेष प्रयत्न केले जात आहेत. जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. देशातही मोदी यांच्याबाबत चांगले वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समन्वयाने महाविजय निश्चित आहे. कंत्राटीकरण असो अथवा खासगीकरण, जनतेच्या विरोधात कोणताही निर्णय सरकार घेणार नाही यासाठी पक्षपातळीवर खबरदारी घेतली आहे.

पक्षातील जुन्या-नव्या वादावर बावनकुळे म्हणाले, पक्ष मोठा होतो. व्याप्ती वाढते तेव्हा संवाद कमी पडतो. त्यातून समज-गैरसमज होतात. जुन्या कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटते. अशावेळी योग्य संवाद होणे गरजेचे असते. कोल्हापूर जिल्ह्यातील वादाबाबत स्वत: लक्ष घालणार असल्याने वाद मिटेल. बाबा देसाई यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना मंत्री चंद्रकांत पाटील भेटणार आहेत. त्यानंतर गैरसमज दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावे वाटते. तसे अजित पवार, देवेंद्र फडणीस यांच्याबाबत वाटते, त्यात गैर काय आहे.

आम्ही सत्तेत नसताना आत्मपरीक्षण करत आलो आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची अशी स्थिती का झाली याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काही केले नाही. एकनाथ शिंदे मात्र अगदी नगरसेवकांनाही निधी देऊन कार्यकर्ते व पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे समर्थन नक्कीच वाढणार आहे. भाजपबद्दल सोशल मीडियावर जाणीवपूर्वक नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. फारशी चिंता करण्याची गरज नाही. जनतेला सर्व काही समजते. लोकसभेसाठी नागरिक आणि जनतेचे एक हजार 200 ग्रुप तयार करून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेस खा. धनंजय महाडिक, केशव उपाध्याय, माजी आमदार अमल महाडिक, मुरलीधर मोहोळ, समरजितसिंह घाटगे, विजय जाधव, अशोक देसाई, गणेश देसाई उपस्थित होते.

कोल्हापूरबाबत केंद्रीय कमिटी निर्णय घेईल

अजित पवार यांनी मोदी यांचे नेतृत्व मान्य केल्याने ते भाजपसोबत आहेत, असे सांगून बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणूक जागा वाटप असो अथवा उमेदवार याचा निर्णय केंद्रीय कमिटी घेते. त्यामुळे कोल्हापूरबाबतही केंद्रीय कमिटीचा निर्णय असेल, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news