लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची नजर ही प्राधान्याने 80 जागा असणार्या उत्तर प्रदेशवर असते. दिल्लीतील सत्तेचा महामार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या सत्तेमध्ये या राज्यातील विजयाचा मोठा वाटा होता, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आपला विस्तार वाढवण्यासाठी जोरकसपणाने प्रयत्न करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची रणनीती म्हणून विविध छोट्या राजकीय पक्षांना आपल्यासोबत घेत आहे; पण आघाडीनंतर जागावाटपाच्या बाबतीत आपल्या मित्रपक्षांचे समाधान कसे करायचे, ही भाजप नेतृत्वापुढील समस्या बनणार आहे. याचे कारण, हे मित्रपक्ष लोकसभेच्या जागांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त दावे करत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, भाजपचा जुना मित्रपक्ष असणारा अपना दल सध्या लोकसभेसाठी पाच जागांवर दावा करत आहे, तर निषाद पक्षाचा दावा त्याहून मोठा आहे. तेही चार-पाच जागांवर दावा ठोकत असल्याचे दिसते.