आशिष देशमुख
पुणे : गेल्या पाच वर्षांपासून भारत व पाकिस्तान हे दोन देश उन्हाळ्यात जगात सर्वाधिक तापत आहेत. यात शहरी भाग अर्थात सिमेंटची जंगलं ही ग्रामीण भागापेक्षा खूप तापली. मात्र, जेथे बागायती शेती आहे त्या भागात 15 अंशांनी कमी तापमान नोंदविले गेले. नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने 2018 मध्ये एक उपग्रह सोडला होता. 'इको-सिस्टिम स्पेस बॉर्न थर्मल रेडिओ मीटर' असे या उपग्रहाचे नाव असून, तो पथ्वीच्या भूगर्भातील पाणी तपासण्यासाठी सोडला आहे.
यात त्याने जे फोटो पाठविले आहेत, यात भारतीय उपखंडातील काही शहरे प्रचंड तापल्याचा उल्लेख आहे. तसेच नकाशा देखील आहे. या उपग्रहाने सुमारे 12 हजार 350 चौरस किलोमीटर परिघातील छायाछित्रे पाठवली आहे. यात 28 दशलक्ष लोकांवर या उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाल्याचे म्हटले आहे.
पर्यावरणात मानवाचा हस्तक्षेप व सिमेंटने बांधलेल्या इमारती, रस्ते, उड्डाणपूल यामुळे शहरे ग्रामीण भागापेक्षा जास्त तापली. शहराचे सरासरी कमाल तापमान 38 अंश, तर ग्रामीण भागाचे 35 अंशांवर गेले आहे. जेथे बागायती शेती आहे, त्या भागाचे तापमान तर 15 अंशांनी कमी जाणवत असल्याचा अहवाल नासाने प्रसिध्द केला आहे. 2027 पर्यंत यात अधिक वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय उपखंडातील ऐतिहासिक उष्णतेच्या लाटेदरम्यान दिल्लीच्या आसपासच्या शहरी भागांत तापमान वाढल्याचे दस्तऐवज स्पेस स्टेशनवरील उपकरणावर आहे. 5 मे रोजी स्थानिक मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी घेतलेली ही प्रतिमा उपग्रहाने पाठवली आहे. दिल्लीच्या वायव्येकडील शहरी भाग आणि शेतजमिनी दाखविल्या आहेत. ज्यात सुमारे 28 दशलक्ष लोक राहतात. प्रतिमा सुमारे 4,800 चौरस मैल म्हणजे 12,350 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. यात दिल्ली, जिंद, रोहतक, भिवानी, सोनीपत, गोहाना या शहरांत कमालीची उष्णता वाढल्याने तेथील जैवविविधता बदलत असल्याची नोंद घेण्यात आली आहे.