कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाचा सामना करत असताना ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली असून आपल्या शेतात उभी असलेली पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. असे असतानाच कडूस शेंडेवाडी (ता. खेड) परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक मिटर लांबीच्या सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीच्या केबलसह विद्युत पंपाच्या मोटारीतील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या. त्यामुळे या नविन संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कडूस पाझर तलावावर परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मोटारी असून विद्युत पंपाच्या चोरी, मोटारीतील तांब्याच्या तारा, तर केबलच्या चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असून चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तसेच पाझर तलावा शेजारी महावितरणचे ट्रान्सफार्मर असून त्यावर असणारा बाटला खाली एका शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात उतरवून त्यातील तांबे, आँईल चोरट्यानी लांबवले असून परिसरातील सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान केले आहे.
शेतकरी अभिनाथ शेंडे, राघु कालेकर, नवनाथ पानमंद, आकाश कालेकर, महेंद्र धायबर, लक्ष्मण बोंबले, रंगनाथ कालेकर, सुभाष नाईकरे, मंगेश पानमंद, संतोष गारगोटे, दत्ताञय शेंडे, विठ्ठल कालेकर, प्रकाश बोऱ्हाडे आदी शेतकऱ्यांच्या मोटारीच्या वायर सोलून तांबे लांबवले. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा