![लोकसभा निवडणूक : बसपाला मोठा धक्का..! बरेली आणि आमला मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज फेटाळले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2F%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीला (बसपा) मोठा धक्का बसला आहे. बरेली आणि आमला लोकसभा मतदारसंघातील बसपाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. बरेलीमधून छोटेलाल गंगवार आणि आमलामधून आबिद अली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. तपासात दोन्ही बसप उमेदवारांचे उमेदवारी अर्जात त्रुटी आढळली. यामुळे हे अर्ज फेटाळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता दोन्ही जागांवर बसपा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडली आहे.
याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, बरेली लोकसभा मतदारसंघातून 28 उमेदवारांनी 42 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. छाननी दरम्यान 14 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहे. 14 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध आहे. बरेलीमधून बसपचे उमेदवार छोटेलाल गंगवार यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या अर्जामधील काही कॉलम कोरे ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
बरेली मतदारसंघातून 28 आणि आमला मतदारसंघातून 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार आपली ताकद दाखवतील, हे उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीनंतर निश्चित होणार आहे. बरेली मतदारसंघातून माजी महापौर सुप्रिया ऐरन, सपा उमेदवार प्रवीण सिंग ऐरण, आमला मतदारसंघातून आबिद अली आणि इतर अनेकांनी अर्ज दाखल केला होता.