![जत : भाऊबीज दिवशीच बहिण-भावावर काळाचा घाला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F11%2Facci.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जत : पुढारी वृत्तसेवा
दरीबडची (ता. जत) येथील सख्खे बहिण-भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दरीबडची-दरिकोनुर या रस्त्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काजल श्रीमंत चौगुले (वय १६), अक्षय श्रीमंत चौगुले (वय २२) असे अपघातात ठार झालेल्या बहिणी-भावाची नावे आहेत. भाऊबीज दिवशीत सख्ख्या बहिण-भावाचा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अक्षय चौगुले हा आपली लहान बहिण काजलसह पंढरपूर येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीज साजरी करण्यासाठी दूचाकीवरून गेला होता. शनिवारी दुपारी दोघे पंढरपूरवरून दरीबडची गावी परत येत होते. दरम्यान सोरडी ते दरिकोनुर या रस्त्यावर मोटरसायकलवरून प्रवास करत असताना एका वळणावर समोरून येणारे चारचाकी वाहन दिसले नाही. ही चारचाकी कर्नाटकातील चिकोडी येथून येत होती. या वाहनाला दूचाकीची धडक समोरासमोर बसली. यात काजल चौगुले व अक्षय चौगुले हे सख्खे बहीण-भाऊ जागीच ठार झाले. ऐन दिवाळीत चौगुले कुटुंबातील सख्ख्या बहिण-भावावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.