अलिबाग : कृषीप्रधान भारतात मोठ्या प्रमाणात तांदळाची शेती केली जाते आणि आहारात देखील मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले जाते. तांदूळ केवळ स्वादिष्टच नाही तर मानवी आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. सर्वसाधारणपणे तांदूळ पांढरा असतो. परंतु, आता काळ्या तांदळाच्या विविध गुणांमुळे कोकणातील शेतकर्यांचा या काळ्या तांदळाच्या लागवडीकडे गेल्या दोन वर्षांपासून कल वाढला आहे. काळ्या रंगाचा तांदूळ देशात सर्वत्र उपलब्ध आहे. तथापि, त्याचा वापर फारच कमी किंवा नगण्य होता. सुरुवातीला काळ्या तांदळाविषयी अनेक गैरसमज होते. परंतु, कृषी विभागाने गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतलेल्या काळ्या तांदळाच्या प्रोत्साहन योजनेमुळे कोकणात काळ्या तांदळाची लागवड सुमारे 2400 हेक्टरवर झाली असून उत्पादन आणि विक्री याला आता गती येत आहे.
यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो. फिलिपाईन्समध्ये व इंडोनेशियात याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या प्रकारच्या तांदळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. काळ्या तांदळात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मानवाला अनेक रोगांपासून दूर ठेवतात. पचायला सोपा असणारा या भातात कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता आहे, तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.