पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या पाठोपाठ आता जयंत सिन्हा यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
जयंत सिन्हा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे भारत आणि जगामध्ये हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणे माझे लक्ष्य आहे. मात्र पक्षाच्या आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर मी काम करत राहणार आहे.
'मी खूप भाग्यवान आहे की मला गेली 10 वर्षे भारत आणि हजारीबागच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजप नेतृत्व, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला अनेक संधी दिल्या, ज्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
जयंत सिन्हा हे झारखंडमधील हजारीबागचे खासदार आहेत. जयंत सिन्हा हे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र असून 2014 ते 2016 दरम्यान ते देशाचे अर्थ राज्यमंत्री होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत युवा नेत्यांना तिकीट देणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. अशा स्थितीत अनेक विद्यमान खासदारांना पक्ष संघटनेत काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :