![Arvind Kejriwal](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FReal-estate-listing-presentation-2023-10-30T220858.264.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीद्वारे होणाऱ्या चौकशीकडे पाठ फिरवून सत्याचा सामना करण्यास नकार दिला आहे. त्यांनी चूक केली हे यातून सिद्ध झाले आहे, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. (BJP Vs Kejriwal)
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्ष मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पक्षावर आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. मद्यधोरण प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावुन चौकशीसाठी बोलावले होते. अरविंद केजरीवाल स्वतःला प्रामाणिक समजतात, प्रत्यक्षात ते तसे नाहीत. ईडीकडून उगाच कोणालाही बोलावले जात नाही. वस्तुस्थितीच्या आधारे बोलावले जाते. केजरीवाल यांनी काही केलेच नसेल तर चौकशीला सामोरे जायला काय हरकत आहे, अशी सवालांची फैर प्रवक्ते संबित पात्रा यांनी झाडली. (BJP Vs Kejriwal)
भाजप प्रवक्ते म्हणाले, की मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातच मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिपणी ही त्यांच्या भ्रष्ट्राचाराची पावती आहे. अरविंद केजरीवाल दररोज रोज सत्तेतील आणि विरोधातील नेत्यांची नाव घेऊन आरोप करत होते आणि आता चौकशीपासून पळ काढत आहेत. केजरीवाल हे भ्रष्टाचाराचा महासागर आहेत. या महासागरातील काही भाग म्हणजे मनिष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंद्र जैन आहे, असा टोलाही पात्रा यांनी लगावला. चौकशीसाठी न जायला केजरीवाल नियमापेक्षा मोठे नाहीत. त्यांचे सहकारी प्रामाणिक होते तर न्यायालयाने त्यांचा जामिन का नामंजूर केला असा उपरोधिक सवालही संबित पात्रा यांनी केला. (BJP Vs Kejriwal)