पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना कीटकनाशक प्रयोग, सिंचन, मातीची गुणवत्ता, हवामानाचा पूर्व अंदाज या कृषी संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळण्यासाठी स्वदेशी बनावटीचे कृषी सॅटॅलाइट लॉन्च केले जाणार आहे. केंद्रसरकारने ग्रामीण भागात "लखपती दीदी" योजना राबवून १ कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. आणखी ३ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. आयुष्यमान आरोग्य योजनेत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांचाही समावेश केला जाणार आहे. ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्राच्या विकासातून २ लाखांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट ब्रॉडबँडने जोडले जाणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने विमा योजना राबविली जाणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यासारख्या दुर्घटनांमधून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण दिले जाईल. शिक्षण आरोग्य, पायाभूत सुविधा, क्रीडा, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक विकास आदी सर्व क्षेत्रातील गॅरंटी या संकल्पनाम्यात सामील करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.