मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपकडून विधानपरिषदेसाठी आज (दि. ९) पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. तर रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांना अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचा पाठिंबा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने आज खोत यांना मुंबईला बोलावल्यापासूनच राजकीय चर्चांना ऊत आला होता. आता याला पूर्णविराम मिळाला आहे. आमचे ५ उमेदवार आणि सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून पाठिंबा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ६ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यात विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. मात्र भाजपने २० तारखेला १० जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पाच जणांच्या यादीत मेटे, जानकर यांना वगळले होते. जानकर यांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, मेटे यांना पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. त्यावर या नेत्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, यावेळी विधान परिषदेसाठी भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, अशी चर्चा होती. पंकजा मुंडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोनं करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पाच जणांच्या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव कट करण्यात आले आहे.
राज्यातील विधान परिषदेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ५ उमेदवारांची यादी काल (दि. ८) जाहीर केली आहे. या यादीत भाजपच्या घटक पक्षांतील नेत्यांना डावलण्यात आले आहे. तर पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना वगळून उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :