BJP Election Target : दक्षिणेतून ५० खासदार निवडून आणण्याचे भाजपचे उद्दीष्ट

BJP Election Target : दक्षिणेतून ५० खासदार निवडून आणण्याचे भाजपचे उद्दीष्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आव्हान मोठे असल्याने या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची यासोबतच, दक्षिणेतील राज्यांमधून किमान ४० ते ५० खासदार निवडून आणण्याची भाजपची रणनिती असल्याचे समजते. (BJP Election Target)

भाजप सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेतील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांमध्ये पक्षाच्या जागा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या पाच राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश मिळून लोकसभेच्या एकूण १२२ जागा आहेत. त्यात भाजपकडे कर्नाटकमधील २५ आणि तेलंगाणातील ४ अशा २९ जागा आहेत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. त्या पार्श्वभूमीवर या राज्यात कमीत कमी जागा गमावणे आणि दक्षिणेतील इतर राज्यांमधून अधिकाधिक जागा मिळविण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेतून किमान ४० ते ५० जागा भाजपला मिळतील. यासोबतच, लोकसभेच्या १३० जागा असलेल्या बिहार (४०), पश्चिम बंगाल (४२) आणि महाराष्ट्र (४८) या तीन राज्यांमधूनही मोठ्या संख्येने खासदार निवडून येतील, असे भाजप सुत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप अशा महायुतीने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये खुद्द अमित शाह यांनी ३५ जागा जिंकण्याचे उद्दीष्ट घोषित केले होते. बिहारमध्ये २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या युतीने ३३ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपच्या १७ तर संयुक्त जनता दलाच्या १६ जागा होत्या. नंतर दोन्ही पक्षामध्ये फाटाफूट झाली. असे असले तरी नितीशकुमार यांना मिळालेल्या १६ जागांमध्ये भाजपच्या मतांचा हिस्सा मोठा असल्याने बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढतील असा ही दावा सुत्रांनी केला. (BJP Election Target)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'तीसरी बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार' ही नवी घोषणा दिली आहे. पक्ष मुख्यालयात यासंदर्भात काल पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती. त्यात केंद्र सरकारमधील मंत्री आणि संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता. त्यात लोकसभा निवडणुकांवर व्यापक मंथन झाले होते. त्यात ग्यान योजनेचीही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राममंदिराचा मुद्दा निवडणुकीपर्यंत प्रकाशझोतात ठेवण्याबरोबरच पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे शेतकरी, गरीब, महिला आणि तरुण या चार जातींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्यान (गरीब, युवक अन्नदाता आणि नारी) ही विशेष मोहिमही असेल, असे भाजपकडून सांगितले जात आहे. (BJP Election Target)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news