पुढारी ऑनलाईन: भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या आरोपावर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुशील मोदींचे नाव न घेता ते म्हणाले की, मला उपराष्ट्रपती व्हायचे आहे, असे एका व्यक्तीचे म्हणणे आहे, ते तुम्ही ऐकले आहे. हा पूर्णपणे विनोद आणि फसवणूक आहे. माझी तशी इच्छा नव्हती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही त्यांना किती साथ दिली हे ते विसरले का? त्यांना पुन्हा जनतेत त्यांची जागा मिळावी म्हणून ते माझ्या विरोधात बोलत आहेत.
जेव्हा मीडियाने त्यांना विचारले की, पीएफआयच्या तपासामुळे तुम्ही भाजपशी युती तोडली का? यावर मुख्यमंत्री नितीश यांनी उत्तर दिले की, हे सर्व बकवास आहे. तपासामुळे युती तुटते का? युती तुटण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत जी आम्ही तुम्हाला आधीच सांगितली आहेत.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की भाजपने जेडीयूच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे केल्याचा आरजेडीचा आरोप साफ खोटा आहे. सत्य हे आहे की जेडीयूने आपले उमेदवार भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उभे केले. जेव्हा-जेव्हा नितीश कुमार यांच्या मनात पंतप्रधान होण्याचा विचार येतो तेव्हा ते असे बोलतात. पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा त्यांना वेळोवेळी जनादेशाचा विश्वासघात करण्याची संधी देते.
पक्ष बदलणाऱ्यांसाठी नितीश हे मार्गदर्शक : हिमंता बिस्वा सरमा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवत म्हटले, ज्यांना दर सहा महिन्यांनी पक्ष बदलावा लागतो त्यांनी नितीश कुमार यांना मार्गदर्शक बनवावे. ६-८ महिन्यांनंतर नितीशकुमार पुन्हा त्या आघाडीतून बाहेर पडणार नाहीत, याची खात्री कशी देता येईल? आपणही राजकीय पक्ष बदलले आहेत, पण त्यांच्यासारखे नाही. दर सहा महिन्यांनी पक्ष बदलण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ते 'मार्गदर्शक' आहेत.
जे विकले जातात त्याची रक्कम भाजप ठरवते : तेजस्वी
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की झारखंड, महाराष्ट्रात काय झाले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे? आम्हाला जनतेची काळजी आहे, काम करायचे आहे. कामावर राजकारण व्हायला हवे. जे उभे आहेत, ते (भाजप) त्यांच्या मागे सीबीआय, आयटी, ईडी लावतात, जे विकतात त्यांच्यासाठी ते रक्कम ठरवतात.