पुढारी ऑनलाइन डेस्क : Bihar Hooch Tragedy : बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. बिहारच्या पूर्व चंपारण्य किंवा मोतीहारीत आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 14 जणांचा मृत्यू दारूचे सेवन केल्याने झाला आहे, अशी माहिती DM सौरभ जोरवाल यांनी दिली. तर अन्य लोकांचा मृत्यू संदिग्ध आहे. विषारी दारूच्या सेवनामुळे हे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये यापूर्वीही विषारी दारूच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता.
पूर्व चंपारण (मोतिहारी), हरसिद्धी पहारपूर, तुर्कौलिया, सुगौली आणि रघुनाथपूर या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सुरुवातीला जेव्हा दारुमुळे मृत्यू झाले तेव्हा प्रशासनाने त्याला डायरिया मुळे मृत्यू झाल्याचे म्हटले होते.
तुर्कौलियाच्या लक्ष्मीपूरमध्ये चार जणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गुरुवारी सर्व लोक रघुनाथपूरच्या बाळगंगा येथे गव्हाच्या पिकाची रोजंदारी घेण्यासाठी गेले होते. यानंतर हे लोक संध्याकाळी दारू पार्टीसाठी घरी आले असता रात्री डोके दुखत असल्याचे सांगून झोपले. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती ढासळू लागली. ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. यानंतर यातील एक एकर लोकांचा मृत्यू झाला. या परिसरात विषारी दारूचा पुरवठा करण्यात आला आणि ते पिऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मोतिहारीचे डीएम सौरभ जोरवाल यांनी सांगितले की, दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांवर उपचार सुरू आहेत प्रकरण गांभीर्याने घेत परिसरात छापे टाकण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या परिसरात कुठे दारू तयार केली जात होती. याबाबतही माहिती घेतली जात असून, काही जणांची चौकशी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
बिहारमध्ये हे पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वी देखील विषारी दारू पिल्यामुळे अशा प्रकारचे मृत्यू तांडव घडले आहे. बिहारमध्ये डिसेंबर 2022 मध्ये सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्यामुळे तब्बल 60 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक गावांवर शोककळा पसरून तब्बल 126 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
हे ही वाचा :