![कुटुंब नियोजनावर वादग्रस्त वक्तव्य; मुख्यमंत्री नितीशकुमारांचा माफीनामा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FNitish-Kumar-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कुटुंब नियोजनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावर त्यांनी माफी मागितली असली तरी त्यामुळे निर्माण झालेले वादळ अजून शमलेले नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा सूचना विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत. भाजपने देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांनी यावर सावध पवित्रा घेतला असला तरी भाजपसह एमआयएमने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Nitish Kumar Statement)
लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलताना नितीश कुमार यांनी विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांचे मागे असलेले काही आमदार हसत होते. नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने ताशेरे ओढले आहेत. आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्षांना लिहीलेल्या पत्रात नितीश कुमारांवर कठोर कारवाई करण्याचा सूचना देखील दिल्या आहेत. देशातील सर्व महिलांच्या वतीने राष्ट्रीय महिला आयोगाने नितीशकुमारांना माफी मागण्यास सांगितले आहे. त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत हे वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे. या देशातील प्रत्येक महिला सन्मानपात्र आहे. नितीश कुमारांनी भाषणात वापरलेले शब्द अत्यंत वाईट आणि खालच्या दर्जाचे आहेत. राष्ट्रीय महिला आयोग या प्रकारच्या गोष्टींच्या विरोधात आहे. नितीश कुमार यांचे वक्तव्य कामकाजाच्या नोंदीवरून काढून टाकण्यात यावे, अशीही स्पष्ट सूचना पत्रात केली आहे. (Nitish Kumar Statement)
दरम्यान, नितीश कुमारांच्या या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बिहार विधिमंडळाबाहेर भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली, नितीश कुमारांविरुद्ध घोषणाबाजी केली. महिला आमदारांनीही जोरदार निदर्शने करत महिलांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात एका प्रचारसभेत बोलताना त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे, तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, भाजप प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनीही खरमरीत शब्दात टीका केली आहे. मात्र नितीश कुमारांनी क्षमायाचना करून हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा