मुदाळतिट्टा, प्रा.शाम पाटील : बिद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. येत्या 15 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कारखान्याचे नुतन चेअरमन म्हणून माजी आमदार के. पी. पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. पण व्हाईस चेअरमन कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपाध्यक्षपद कागल तालुक्याला, करवीर तालुक्याला की राधानगरीकडे राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Bidri Sakhar Karkhana)
पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, आमदार संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकून बिद्री कारखान्यावर सत्ता काबीज केली. माजी आमदार के .पी .पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. निवडणूक प्रारंभ पासून ते शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे मोठ्या मताधिक्याने पॅनलचा विजय झाला. 5500 ते 7000 च्या दरम्यान उमेदवार निवडून आले.
मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) ए. वाय. पाटील, मारूती जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये अगदी खालच्या पातळीवर आरोप सुद्धा एकमेकांवर केले गेले. राज्यात सत्तेत एकत्र नांदत असताना सुद्धा बिद्रीची सत्ता काबीज करण्यासाठी झालेली आरोग्य प्रत्यारोपाची खैरात चर्चेचा विषय ठरली.