मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने केंद्रीय कराराबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि ईशांत शर्मा यांना वार्षिक केंद्रीय करारातून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आता बीसीसीआय कसोटी संघासाठीसुद्धा रहाणे व शर्मा यांच्या नावाचा विचार करणार नाही.
अजिंक्य रहाणे, ईशांतसाठी वाईट बातमी असली तरी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलसाठी उत्साह वाढवणारी बातमी ठरणार आहे. कारण, या दोघांनाही बीसीसीआयने केंद्रीय करारात बढती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतच्या अंतिम यादीवर बीसीसीआयच्या 21 डिसेंबर रोजी होणार्या विशेष बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
केंद्रीय करारानुसार ग्रुप ए प्लसमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, ग्रुप एमधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रुप बीमधील खेळाडूंना 3 कोटी तर ग्रुप सीमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.