बडोदा; वृत्तसंस्था : बडोदा येथील हरिणी तलावात पिकनिकसाठी आलेल्या शाळकरी मुलांची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह 16 जणांचा मृत्यू झाला. चार विद्यार्थी बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
बडोदा शहराच्या बाहेर असलेला हरिणी तलाव शहरवासीयांसाठी पर्यटनस्थळ आहे. गुरुवारी या तलावाच्या परिसरात एका शाळेची पिकनिक आली होती. या चमूतील 27 जण बोटिंगचा आनंद घेण्यासाठी एका बोटीत बसले. तलावात फेरी मारत असताना ही बोट अचानक उलटली. बोटीतील विद्यार्थी व शिक्षक पाण्यात पडले. अपघातानंतर स्थानिकांनी व बघ्यांनी मदतकार्य सुरू केले.