संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: निवडणूक आयोगाने जरी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला असला तरी जनता जो निर्णय देईल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच राहील. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीला घातक असल्याचे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. त्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले आहेत. ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे. त्यामुळे शिवसेना ही ठाकरेंपासून कोणीच वेगळी करूच शकत नाही. हा निर्णय निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरीज नता जो निर्णय दिला तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच राहील, हे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे.