बीड/हिंगोली : अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पौरोहित्याची प्रमुख जबाबदारी बीड तालुक्यातील कळसंबर येथील गजानन जोतकर यांनी सांभाळली. तसेच पहिल्या सात गुरुजींत औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील प्रशांत शास्त्री जोशी यांचाही समावेश होता. (Ayodhya Ram Mandir)
जोतकर यांनी संस्कृत विषयात पीएच. डी. केल्यानंतर ६ वर्षे आळंदी आणि धुळे येथे ४ वर्षे वेदाचे शिक्षण घेतले. गेल्या १२ वर्षांपासून वाराणसी येथे द्रविड गुरुजी यांच्याकडे ते पौरोहित्याचे शिक्षण घेत आहेत. औंढा नागनाथ येथील संत नामदेव महाराज वेद विद्यालय पद्यद्मावती मठ या ठिकाणी कार्यरत असलेले प्रशांत शास्त्री जोशी हे पहिल्या सात गुरुजींत होते. त्यांनी वेदाचे शिक्षण आळंदी, नाशिक, काशी येथे घेतले. आयुष्यातील सुवर्णक्षण श्रीरामाच्या मुख्य पूजेचा मान माझा मुलगा गजानन यास मिळाला, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा आमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता, अशी प्रतिक्रिया गजानन यांचे वडील दिलीप जोतकर यांनी व्यक्त केली. तसेच, प्रशांत जोशी यांनी नागनाथाच्या कृपेने आपला सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली.